ग्रामीण भागातील कर्जात वाढ   

वृत्तवेध 

वेगवेगळ्या गरजांमुळे शहरातील लोक बँकांकडून जास्त कर्ज घेत आहेत, असे आतापर्यंत मानले जात होते. लोक कर्ज घेतात आणि त्यांच्या कमाईचा बहुतेक भाग त्यांचा मासिक हप्ता भरण्यासाठी खर्च करतात, असा समज होता; परंतु रिझर्व बँकेचा अलीकडील अहवाल या समजाला छेद देणारा आहे.बँकेने दिलेल्या कर्जाच्या रकमेत आता मोठा बदल दिसून येत आहे. रिझर्व्ह बँकेच्या अहवालात दिसून आले आहे, की गेल्या पाच वर्षांमध्ये महानगरांमध्ये बँकेच्या विविध शाखांनी दिलेल्या कर्जाचा वाटा ६३.५ टक्क्यांवरून ५८.७ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे, तर गावांपासून निमशहरी आणि शहरी भागात बँक कर्जांमध्ये वेगाने वाढ झाली आहे.
 
रिझर्व बँकेच्या अहवालानुसार गावे आणि शहरांमध्ये असलेल्या बँक शाखांनी कर्ज देण्याच्या बाबतीत खूप चांगली कामगिरी केली आहे. तथापि, कर्ज देण्याच्या प्रमाणात घट झाली असली, तरी महानगरांमधील बँक शाखांनी वार्षिक ठेवींमध्ये ११.७ टक्क्यांनी वाढ केली आहे, तर ग्रामीण भागात १०.१ टक्के, निमशहरी भागात ८.९ टक्के आणि शहरी भागात ९.३ टक्के वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये १५.३ टक्के असलेला बँक कर्जाच्या वाढीचा दर २०२४-२५ या आर्थिक वर्षात ११.१ टक्क्यांवर आला आहे. याशिवाय, पाच वर्षांपूर्वी ठेवींच्या वाढीचा दर १३ टक्के होता, तो आता १०.६ टक्क्यांवर आला आहे. यासोबतच, मुदत ठेवींवरील उच्च व्याजदरामुळे दोन वर्षांपूर्वी ३३ टक्के असलेला वाटा एका वर्षापूर्वी ३०.८ टक्के झाला आणि आता तो २९.१ टक्क्यांवर आला आहे.

Related Articles